चिंतामणराव गणेश कोल्हटकर

चिंतामणराव गणेश कोल्हटकर ( मार्च १२ इ.स. १८९१ मृत्यू : नोव्हेंबर २३ इ.स. १९५९ ) 

Marathi Filmography:-






बालपण

चिंतामणराव कोल्हटकर यांचे घराणे नेवरे या रत्‍नागिरी जिल्ह्यातील गावचे होते. त्यांचा जन्म तेथेच १२ मार्च, इ.स. १८९१ रोजी झाला. त्यांचे वडील हे वर्तमानपत्र लेखक आणि वक्ते होते. चिंतामण कोल्हटकरांच्या वयाच्या सातव्या वर्षीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. चिंतामण गणेश कोल्हटकर यांच्या वडिलांचे लहानपणीच निधन झाल्यामुळे चिंतामणरावांच्या शिक्षणाची परवड झाली. 

कारकीर्द

सातारा येथे ‘तुकाराम’ या नाटकात त्यांनी ‘मंबाजी’ची भूमिका साकारून (१९०७) रंगभूमीवर प्रवेश केला. नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर याचं बोट धरून ते महाराष्ट्र नाटक मंडळीत आले आणि १९१८ मध्ये दीनानाथ मंगेशकर, कृष्णराव कोल्हापुरे यांच्या समवेत स्थापन केलेल्या ‘बळवंत संगीत नाटक मंडळी’पर्यंतचा साराच इतिहास मोठा संघर्षमय, रोमांचकारी आणि अद्‌भुत असाच आहे.

कोल्हटकर इ.स. १९११मध्ये महाराष्ट्र नाटक मंडळीत दाखल झाले आणि पुढच्याच वर्षी ते भरत नाटक मंडळीत गेले. इ.स. १९१४ मध्ये ते किर्लोस्कर नाटक मंडळी. तेथे त्यांना प्रसिद्धी मिळाली. १९१८मध्ये त्यांनी दीनानाथ मंगेशकरांच्या भागीदारीत त्यांनी बलवंत नाटक कंपनी काढली. त्यानंतर त्यांनी नाट्यक्षेत्रात अनेक प्रकारची कामे केली.

कोल्हटकरांनी भूमिका केलेली पुण्यप्रभाव, राजसंन्यास, भावबंधन, इ. नाटके खूप गाजली. वेड्यांचा बाजार हे राम गणेश गडकरी यांचे अपूर्ण नाटक त्यांनी पूर्ण केले.

राम गणेश गडकरी, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, इतिहाससंशोधक वासुदेवशास्त्री खरे, वीर वामनराव जोशी, अशा अनेक नामवंत नाटककारांकडून त्यांनी नाटके लिहून घेतली आणि मोठ्या दिमाखात रंगभूमीवर आणली. चिंतामणराव कोल्हटकर आणि मास्टर दीनानाथ मंगेशकर यांनी आपल्या बळवंत संगीत मंडळीतर्फे उत्तमोत्तम नाट्यकृती सादर केल्या आणि गद्य आणि पद्य यांचा अपूर्व साक्षात्कार रंगभूमीवर घडवला.

चित्रपट

१९३१ सालात चित्रपट बोलू लागला आणि नाटक मंडळे धंदा गमावून बसली. इ.स. १९३३च्या सुमारास मराठी संगीत रंगभूमीला प्रेक्षकांचा प्रतिसाद कमी झाला.तेव्हा चितामणरावांनी चित्रपटांत काम करायला सुरुवात केली. त्यांची वसंतसेना (इ.स. १९४२) या चित्रपटातली शकाराची भूमिका गाजली.


परत नाटकाकडे

चिंतामणराव कोल्हटकरांनी बळवंत संगीत मंडळीचे बळवंत पिक्‍चर्समध्ये रूपांतर केले.पण त्यांना या व्यवसायात प्रचंड खोट बसली. कोर्टकचेर्‍या, नामुष्की आणि पदरी आलेलं प्रचंड अपयश पाहून आणि आपल्याच कंपनीत नोकर म्हणून काम करावे लागण्यासारखी मानहानी झाल्याने ते चित्रपटव्यवसायतून तावून सुलाखून बाहेर पडले आणि परत नाटकाकडे वळले.

चिंतामणरावांनी पुढे त्यांनी गंगाधरपंत लोंढे यांच्या राजाराम संगीत मंडळीत प्रवेश केला आणि परत नाटकांतून कामे करायला सुरुवात केली. पुढे ते मो.ग. रांगणेकरांच्या नाट्यनिकेतनमध्ये गेले. अखेरीस त्यांनी ललित कला कुंज नावाची स्वतःची नाटक मंडळी काढली. या कंपनीनेच पु.ल. देशपांडे यांना उदयास आणले.

कोल्हटकरांनी मराठीबरोबरच हिंदी आणि उर्दू नाटकांतही भूमिका केल्या. पुण्यप्रभाव या नाटकातील त्यांच्या भूमिकेबद्दल त्यांचा मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी सत्कार केला होता. त्यांचे विविधढंगी काम पाहून जवाहरलाल नेहरूंनी त्यांना बहुरूपी म्हणून नावाजले होते. त्यामुळेच चिंतामणरावांनी आपल्या आत्मचरित्राला बहुरूपी हे नाव दिले आहे. त्यांनी लिहिलेल्या माझे नाटककार या पुस्तकात तत्कालीन नाट्यलेखकांच्या व्यक्तिरेखा वर्णिल्या आहेत. त्यांनी लिहिलेले पुण्यावतार हे पाच-अंकी नाटक इ. स. १९६६ मध्ये मुंबईच्या आंतरनाट्य या संस्थेने रंगमंचावर आणले होते. जवळजवळ ५० वर्षे त्यांचा रंगभूमीवरील कलाकारांशी कधी नाटककार म्हणून, कधी नट म्हणून तर कधी दिग्दर्शक म्हणून संबंध येत गेला.

त्यांचा मुलगा चित्तरंजन कोल्हटकर हेसुद्धा नाट्यअभिनेते होते. चिंतामणरावांची नात आणि चित्तरंजन कोल्हटकर यांची ज्येष्ठ कन्या, विनीता करमरकर यांनी चिंतामणरावांचे चरित्र लिहिले आहे.

चिंतामणरावांचे नाट्यक्षेत्रातील शिष्य

विश्राम बेडेकर, पु.ल. देशपांडे, चंद्रकांत गोखले, वसंत शिंदे, शांता जोग हे सर्व चिंतामणराव कोल्हटकरांचे नाट्यक्षेत्रातले शिष्य पुढे नावारूपाला आले.

नाट्यसंमेलनांचे अध्यक्ष

चिंतामणराव कोल्हटकर हे इ.स. १९४६ साली अहमदनगर येथे भरलेल्या ३५व्या, आणि इ. स. १९४९ मध्ये कोल्हापूर येथे भरलेल्या ३६व्या नाट्यसंमेलनांचे अध्यक्ष होते.

चिंतामणरावांची चरित्रे

  • बलवंत चिंतामणी (डॉ. विनीता वसंत करमरकर)

पुरस्कार

त्यांच्या या रंगभूमीच्या सेवेबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्णपदक देऊन शासनाने त्यांचा सन्मान केला.

चिंतामणराव कोल्हटकर यांनी कामे केलेली नाटके आणि त्यांतील भूमिका

  • आंधळ्यांची शाळा (अण्णासाहेब)
  • आशीर्वाद (रावबहादुर)
  • एकच प्याला (सुधाकर)
  • कमला (नीलकंठराव)
  • काकाची शशी (मनहरलाल)
  • कांचनगडची मोहना (प्रतापराव)
  • जग काय म्हणेल ()दिवाकर)
  • झुंझारराव (झुंझारराव)
  • तानसेन (अकबर)
  • तुकाराम (मंबाजी)
  • तोतयाचे बंड ()
  • त्राटिका (धनाजीराव, प्रतापराव)
  • द्रौपदी (शकुनीमामा)
  • नेकजात मराठा (जगदेवराव, शिवाजी)
  • पाणिग्रहण (घोडके)
  • पुण्यप्रभाव (वृंदावन)
  • प्रेमध्वज (पहारेकरी)
  • बेबंदशाही (संभाजी)
  • ब्रह्मकुमारी (देवेंद्र)
  • भाऊबंदकी (राघोबा, सुमेरसिंग)
  • भाग्यवान (शिदबा)
  • भावबंधन (घनश्याम)
  • माते तुला काय हवंय ? (युधिष्ठिर)
  • मानाजीराव (मानाजीराव)
  • मानापमान (लक्ष्मीधर)
  • रणदुंदुभी (मातंग युवराज)
  • राजमुकुट (राजेश्वर)
  • राजसंन्यास ( कमलाकर, साबाजी)
  • विद्याहरण (शिष्यवर, शुक्राचार्य)
  • वैजयंती (रत्‍नाकर)
  • शिवसंभव (लखूजी जाधव)
  • संन्यस्त खड्ग (विक्रमसिंह)
  • संशयकल्लोळ ( फाल्गुनराव, भादव्या)
  • सोन्याचा कळस (बाबा शिगवण)
  • स्वयंसेवक (राघोजी राव)
  • हॅम्लेट (चंद्रसेन)
  • हाच मुलाचा बाप (वसंत)
  • हिरवा चुडा (पाटील)
.भालजी पेंढारकरांनी १९३६ मध्ये ‘कान्होपात्रा’ या चित्रपटाची निर्मिती केली. त्या प्रसंगी खलनायकाच्या भूमिकेसाठी चिंतामणरावांना बोलवून घेतले. प्रेक्षकांनी त्यांच्या कामाची प्रशंसा केली. त्याच वर्षात बेडेकरांनी ‘अंधेरी दुनिया’ हा हिंदी चित्रपट काढला. त्यात चिंतामणरावांनी कैद्याची भूमिका रंगवली होती. ‘सूनबाई’ (१९४२) हा भालजींचा अत्यंत गाजलेला बोलपट. चिंतामणरावांचे काम आणि भालजींचा पहिला सामाजिक चित्रपट असल्यामुळे हा चित्रपट भरपूर चालला. ‘वसंतसेना’ ही आचार्य अत्रे यांची भव्य चित्रकृती. शूद्रकांच्या ‘मृच्छकटिक’ या संस्कृत नाटकावरती ती बेतली होती. त्यातील खलनायक - शकाराची भूमिका चिंतामणरावांनी विनोदी पद्धतीने केली. त्यांच्या तोंडी एक गाणे होते ‘वसंतसेना राणी माझी सौंदर्याची गोणी’. पडद्यावर हे गाणे व दृश्य दिसताच प्रेक्षकांतून हास्याचा व टाळ्यांचा कडकडाट होत असे. भालजींनी ‘सूनबाई’चा उत्तरार्ध म्हणून ‘सासुरवास’ काढला. त्यातही चिंतामणरावांनी सासर्‍यांची भूमिका सजवली होती. ‘सासुरवास’ची भट्टी जमली नव्हती. पण अच्युत रानडे यांच्या ‘जागा भाड्याने देणे आहे’ या विनोदी चित्रपटातील त्यांची घरमालकाची व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस आली. ‘मानाचे पान’, ‘माझा राम’, ‘मोठी माणसं’, ‘वासुदेव बळवंत’, ‘मी दारू सोडली’, ‘स्वराज्याचा शिलेदार’ अशा चित्रपटातही चिंतामणराव यांनी कामे केली.

चिंतामणराव कोल्हटकर १९४६ साली अहमदनगर येथे भरलेल्या ३५व्या आणि १९४९ मध्ये कोल्हापूर येथे भरलेल्या ३६व्या नाट्यसंमेलनांचे अध्यक्ष होते. त्यांच्या रंगभूमीच्या सेवेबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्णपदक देऊन भारत सरकारने त्यांचा सन्मान केला होता. 


चिंतामणराव यांनी केलेल्या रंगभूमीच्या सेवेसाठी त्यांना राष्ट्रपतींकडून सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. चिंतामणराव यांनी लिहिलेल्या ‘बहुरूपी’ या आत्मचरित्रास साहित्य अकादमीने १९५८ साली पारितोषिक देऊन गौरवले.बहुरूपी या आत्मकथेने मराठीतील आत्मचरित्रपर वाङ्मयात फार श्रेष्ट स्थान मिळविले आहे. साहित्य अकादेमी पुरस्कार विजेत्या ह्या पुस्तकातून चिंतामणराव कोल्हटकर यांच्या तीव्र व प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाबरोबरच मराठी रंगभूमी, नाटयकला व नाटयवाङ्मय आणि या माध्यमांच्या साह्याने व्यक्त झालेली कसदार मराठी प्रतिमा वाचकाला तल्लीन करते. चिंतामणराव कोल्हटकरांसारख्या एका कसलेल्या नटाच्या, श्रेष्ट दिग्दर्शकाच्या व अनुभवसिद्ध नाटय व्यावसायिकाच्या या आत्मकथेने मराठीतील आत्मचरित्रपर वाङ्मयात वरचे स्थान मिळवले आहे.


 चिंतामणराव कोल्हटकर यांचे २३ नोव्हेंबर १९५९ रोजी निधन झाले. 

(साभार-महाराष्ट्रानायक)

No comments: